विचार केलाच तर !
□विचार केलाच तर !
~~~~~~~~~~~
आज थोडेसे वेगळेच लिहावेसे वाटते. त्याला कारण झालेय, एका सुप्रसिद्ध व महत्वाच्या वर्तमानपत्राच्या मालक/चेअरमन यांच्या एक सोमवासरीय स्तंभातील लिखाणाचे! हा स्तंभ माझा अतिशय आवडता आहे. मी हा स्तंभ कधीही चुकवत नाही. या स्तंभातून मांडण्यात येणारे/आलेले विचार व त्यावरील उपाययोजनाही मननीय, विचारणीय व आचरणीयही असतात. आजच्या स्तंभात त्यांनी किशोरवयीन गुन्हेगारांच्या समस्येविषयी अतिशय मुलभूत चिंतन मांडले आहे. (प्रत्येकाने ते अवश्य वाचावे असे मला वाटते.) त्यावरील माझा प्रतिसाद मी कोणत्याही टिपणी किंवा भाष्याशिवाय व्यक्त करीत आहे.
एक:-मी बालपणी कदाचित खूप सुंदर दिसत असावा(?). मी 4थी किंवा 5वीत असेन. गावांमध्ये आजही बहुतेक घरी लघवीसाठी जनावरांचा गोठाच राखीव असतो. आमच्या वाडीत बांधलेल्या गोठ्यात एका सकाळी मी लघवीला गेलो होतो. बसून लघवी करायची सवय होती. मी लघवी करीत असतांनाच कोणीतरी हळूच येऊन माझ्या खांद्यावर हात ठेवले. अर्थातच मी दचकून मागे पाहिले. माझ्याच वयाची एका *****ची मुलगी होती ती! तिने केलेली "मागणी" ऐकूनच मी तेथून पळालो व थेट आईकडे जाऊन "हे" सांगितले. आईने केलेला "उपदेश" आजही लक्षात आहे. माझ्या बालपणातील हा "एकमेव" प्रसंग नव्हे. असे आणखी काही प्रसंग तेव्हा माझ्यासोबत घडले आहेत. या व अशाच अन्य प्रसंगांना माझी दिवंगत आई आणि आमचा तत्कालीन गडी लोंढू हे साक्षी आहेत. यावर माझी टिपणी किंवा भाष्य न करता एवढेच सांगतो की ही घटना आजची(?) नसून माझ्या खेड्यातील/1964-65 दरम्यानची आहे.
दोन:-माझ्या काॅलेज जीवनातील माझ्या मित्राने सांगितलेली त्याची आपबीती अशी की, तो त्याच्या मामाच्या गावी उन्हाळ्याच्या सुटीत दरवर्षीप्रमाणे गेलेला असताना त्यावेळी त्याच्यापेक्षा 2-3 वर्षे मोठी नात्यातील मुलगी सुद्धा तेथे आलेली होती. त्यावेळी गावांमध्ये उन्हाळ्यात अंगणात झोपत असत. रात्री बारानंतर थंडी लागायची, पांघरावे लागे. एके रात्री ती मुलगी हळूच याच्या चादरात घुसून याच्या प्रायव्हेट पार्टशी चाळा करू लागली व शेवटी तेच घडले जे अशावेळी अनिवार्य ठरते. त्यावेळी माझ्या त्या मित्राचे वय असेल 10-12 वर्षाचे व त्या मुलीचे 14-16! ही घटना सुद्धा माझ्या मित्राच्या आजच्या वयाच्या अंदाजानुसार 1966-67 मधील असावी. टिपणी/भाष्य नाही!
तीन:-मी B.Sc. च्या प्रथम वर्षाला असताना माझे जिजाजी B.Ed. करायला आमच्यासोबतच रहायचे. मी भयंकर(?) वाचनवेडा असल्याने त्यांची मोठमोठी पाठ्यपुस्तके(?) सुद्धा मी वाचायचो. तेव्हा मी "विद्यार्थ्यांना शिक्षा करू नये या सिद्धांताला व बुद्ध्यांक (IQ) या संकल्पनेला माझा विरोध(?) दर्शवून जिजाजींसोबत वादविवाद(?) करीत असे. त्यावेळी व आजही माझे मत हेच आहे की, या दोन्ही संकल्पना (बुद्ध्यांक without भावनांक) म्हणजे पाश्चात्यांचे खूळ असून भारतीय संस्कृती व जीवनसंकल्पनांना मारक आहेत. पुढे मी शिक्षक म्हणून सहा वर्षे (1978-1984) विद्यार्थ्यांना "बिघडवण्याचे" कार्य केलेय, B.Ed.(Merit मध्ये) सुद्धा केलेय. पण "या" दोन्ही संकल्पना कधीच राबवल्या नाहीत. माझ्या शिक्षेमुळे(?) तर मी (सु)बदनाम होतो. मी शिक्षकी पेशा(?) 1984 मध्येच सोडून महाराष्ट्र शासनात राजपत्रित अधिकारी राहून निवृत्त झालोय. तरी आजही माझे तत्कालीन/भूतपूर्व विद्यार्थी भेटले तर प्रथम माझ्या "शिक्षे"चीच चर्चा होते. पण मी शिक्षक असतांना किंवा आज सुमारे 35-40 वर्षानंतरही माझ्या एकाही विद्यार्थ्याने किंवा त्यांच्या पालकांनीही मला "नालायक" म्हटल्याचे वा मला त्यासाठी टोकल्याचे माझ्या ऐकिवात नाही. यावरही टिपणी/भाष्य नाही.
चार:-माझी आजी तुरजाबाई, इस्रायलच्या गोल्डा मायर सोबतच 08.12.1978 ला निसर्ग-शरण झाली. तिला गावातील काही महिला आपल्या बालवयीन नातवा/मुला-मुलींसोबत भेटायला येत. ती बालवयीन मुले-मुली वडीलधा-यांशी बोलतांना "तू" चा वापर(?) करू लागली तर माझी आजी त्या आजी/आईला रागावत असे की, त्यांनी आपल्या मुले/मुलींना बोलण्या-वागण्याचे "संस्कार" दिले नाहीत म्हणून. अर्थातच ह्या घटना 1978 पूर्वीच्याच आहेत. यावरही टिपणी वा भाष्य नाही.
अजूनही काही घटना/प्रसंग आहेत. पण फेबुची मर्यादा सांभाळणे भाग असल्याने येथेच थांबतो.
जय हो, जय हिंद.
चूक-भूल क्षमस्व.
@ॲड.लखनसिंह कटरे (13.11.2017/2019/2021)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment