जाणीवनिष्ठा... एक ओळख
बोरकन्हार(आमगांव)-441902, दि.29.01.2019
---------------------------------------------------------------------
□जाणीवनिष्ठा : एक ओळख□
----------------------------------
मी नेहमी लिहायचो/सांगायचो की मी अजूनतरी कोणत्याही वाद(ism)च्या चक्रव्युहाला शरण गेलेलो नाही व पुढेही कधी शरण जाईन असे बिलकुल वाटत नाही. कारण मला माझ्या अफाट व भयंकर "अज्ञाना"ची स्पष्ट जाणीव आहे. परंतु या विधानावरून मला नेेेेमके काय म्हणावयाचे/सांगावयाचे आहे याचा बोध, बहुतेकदा, समोरच्याला पूर्णपणे होत नव्हता.
मला हे कळायचे सुद्धा. पण या dilemma तून बाहेर पडण्याचा योग्य व सुस्पष्ट मार्ग मला सापडत नव्हता.
नुकताच श्री.प्रफुल्ल शिलेदार यांच्या संपादकत्वाखालील "युगवाणी" चा ऑक्टोबर-नोव्हेंबर-डिसेंबर-2018 चा सुंदर अंक प्राप्त झाला. त्यातील श्री.सुधीर रसाळ यांचा "गो.वि.करंदीकरांची समीक्षा" हा लेख वाचत असताना
विंदांच्या "परंपरा आणि नवता" यातील सुधीर रसाळांनी दिलेली उद् घृते वाचली. त्यातील खालील उद् घृत मला गदगदा हलवून गेले. ते असे, "लिहिणारा 'मी' आणि लिखाणातला 'मी' हे दोन्ही भिन्न असतात. ही स्थिती आत्मनिष्ठेची किंवा समाजनिष्ठेची नसतेे. तिला जाणीवनिष्ठा म्हटले पाहिजे. माझी आताची बरीच कविता जाणीवनिष्ठेच्या संबंंधात निर्माण होते; मला हीच प्रेरणा काव्यदृष्ट्या अधिक महत्वाची वाटते." (तिरपा ठसा माझा.) या विधानाने मला माझी identity स्पष्ट करून दिली.
मला सुद्धा असेच म्हणावयाचे/सांगावयाचे आहे की, मी फक्त, फक्त आणि फक्त माझ्या जाणीवनिष्ठेलाच शरण जातो. माझी आत्मनिष्ठा किंवा समाजनिष्ठा मला अजून त्यांची शरणागत करू शकलेली नाही व पुढेही तशी शक्यता बिलकुल दिसत(?) नाही.
धन्यवाद, सुधीर रसाळजी आणि प्रफुल्ल शिलेदारजी!
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902
(जि.गोंदिया/29.01.2019)
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤|||●●●|||¤¤¤¤¤¤¤¤¤
Comments
Post a Comment