राजकन्या सुरेखा, अरुणा आणि अमात्य-पुत्र (एक लघुकथा)

बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,       दि.15.02.2019

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

     राजकन्या सुरेखा, अरुणा आणि अमात्य-पुत्र...

    ----------------------------------------------

       राजा तैलादित्य हा एक महापराक्रमी राजा होऊन गेला. त्याचे राज्य फक्त सत्तावीस गावापुरतेच होते, त्यामुळे इतिहासात त्याची नोंद दिसून येत नाही. राजा तैलादित्य ला तत्कालीन रिवाजाप्रमाणे तीन प्रमुख राण्या होत्या. बायजादेवी, सयजादेवी आणि सारजादेवी. शिवाय बिन-लग्नाच्या काही बायका व दासी होत्याच राणीवशात. पहिल्या राणीला, बायजादेवीला दोन्ही कन्याच होत्या. त्यांची नावे अनुक्रमे सुरेखादेवी आणि अरुणादेवी. उर्वरित दोन्ही राण्यांना औलाद नव्हती. राजवैद्याने सारे औषधोपचार व राजपुरोहिताने सर्व प्रकारचे नवसादि-पूजापाठ करूनही ह्या दोन्ही राण्यांना काही अपत्य-लाभ होऊ शकलेला नव्हता. त्यामुळे मोठ्या राणीचा वचक जरा जास्तच होता. जरी राजा तैलादित्य नंतर राजगद्दीवर बसणारा राजपुत्र नसला तरी दोन सुस्वरुप व सालस कन्या असल्याने बायजादेवीचे महत्व उर्वरित दोन्ही राण्यांपेक्षा अधिकच होते. 

      तसे पाहिले तर राणीवशातील इतर बिन-लग्नाच्या काही राण्यांना व दासींनाही पुत्रलाभ झालेला होता. पण त्या पुत्रांच्या पिता-निश्चितीबद्दल राजपुरोहितांना काही साधार शंका असल्याने राजा सुद्धा त्या पुत्रांना राजपुत्रांचा दर्जा प्रदान करू शकत नव्हता. तरी त्या पुत्रांपैकी एक पुत्र जो बिन-लग्नाच्या कमळजा नावाच्या राणीचा पुत्र होता, त्याच्या बल, बुद्धी व विद्या यातील प्रावीण्यामुळे त्याला त्याच्या वयाच्या सोळाव्या वर्षीच कनिष्ठ अमात्य म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्याने ती जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली सुद्धा होती. झाले असे की, राज्यातील सत्तावीस गावांपैकी एका बरबसपुरा नावाच्या गावातील एका महाजनाने केलेले राजाविरूद्धचे बंड त्या पुत्राने यशस्वीपणे मोडून काढले होते. तेव्हापासून त्या पुत्राचे, (त्याचे नाव कचरुमल) महत्व राजदरबारात वाढू लागले होते.

        कचरुमल चे वाढते महत्त्व मुख्य अमात्य ढेरूमल याला बोचू लागले होते, कारण त्या पुत्राद्वारे पुढे-मागे मुख्य अमात्याला शह देण्याची शक्यता मुख्य अमात्य ओळखून होता. म्हणूनच ढेरूमलने हळूहळू राणी बायजाबाईचे कान भरायला सुरूवात केली होती. त्याचा परिणाम असा झाला की, बायजाबाईच्या दोन्ही कन्या सुरेखादेवी व अरुणादेवी यांनी राजदरबारातील आपला वावर व अस्तित्व वाढवला होता. राजकन्या अरुणादेवी जरा जास्तच हस्तक्षेप करायची. त्या राजकन्यांचा राजदरबारातील व राज्यकारभारातील वाढता वावर व अस्तित्व-जाणीव पाहून राजा तैलादित्य मात्र मनोमन सुखावत/सुखावला होता. मुख्य अमात्य ढेरूमलच्या कारस्थानाची उकल मात्र राजा तैलादित्य करू शकला नव्हता.

      अशातच एके दिवशी राजा तैलादित्य महाराणी बायजादेवीच्या महालात रमत असताना मुख्य अमात्य ढेरूमल तेथे परवानगी घेऊन प्रवेशता झाला. व अमात्याने कल्पना मांडली की, दोन्ही राजकन्या विवाहयोग्य झाल्या असल्याने आता त्यांच्या विवाहाची तजवीज करून सुरेखादेवीसाठी दूरच्या राज्यातून एक समर्पक, सुयोग्य घरजावई आणून त्याला राज्याभिषेक करावा तथा अरुणादेवीला शेजारच्याच एखाद्या राजाच्या सुस्वरूप व बल, बुद्धी, विद्येने प्रशंषित राजपुत्रासह विवाहबंधनात बांधावे. जेणेकरून ह्या राज्याची फाळणी न होता दोन्ही राजकन्यांना आपापले राज्य मिळू शकेल. 

       राजा तैलादित्य व महाराणी बायजादेवी यांना ही अमात्य-कल्पना पसंत पडली. राजाने ताबडतोब दोन्ही राजकन्या व उर्वरित दोन्ही राण्यांना तेथेच बोलावून घेतले आणि अमात्य-कल्पनेची कल्पना सर्वांना दिली. राजकन्या अरुणादेवी जरा नाराज असली तरी काही आढेवेढे, काही विचारविमर्शानंतर मुख्य अमात्याची कल्पना सर्वसंमतीने मान्य करण्यात आली.

     दुस-याच दिवशी राजदरबारात या निर्णयाची घोषणा करण्यात आली व वरसंशोधनाची वगैरे प्रक्रिया सुरू झाली. कनिष्ठ अमात्य कचरुमल वर सुरेखादेवी व अरुणादेवी यांच्यासाठी सुयोग्य वर शोधण्याची जबाबदारी सोपविण्यात आली व येत्या चैत्र महिन्याच्या पौर्णिमेला विवाह-समारोह पार पाडण्याचे कालबद्ध कार्यक्रम आखण्यात आले. राजदरबारात हा निर्णय झाला त्यादिवशी फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी होती.

       राजा तैलादित्याच्या आदेशानुसार सर्व आपापल्या कामगिरीवर रुजू झाले. दिवस भराभर सरू लागले. होळी आली व गेली. पळस फूलून गेला. नियोजन पुढे सरकत असल्याचे जाणवत होते. काही-बाही कूजबूज ऐकू यायची पण राजा तैलादित्य व मुख्य अमात्य ढेरूमल त्यातून/त्यावर तोडगा काढत असत.

      अखेर चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वादशीलाच अचानक पहाटे पहाटे राजवाड्यात नगारे वाजू लागले. सारी रयत राजवाड्यासमोर जमू लागली. थोड्याच वेळात कनिष्ठ अमात्य कचरुमल, राजा तैलादित्य, राण्या सयजादेवी व सारजादेवी, राजकन्या अरुणादेवी यांना तोंड बांधून व हातकड्या घालून राजवाड्याच्या गॅलरीत उभे करण्यात आले. महाराणी बायजादेवी, राजकन्या सुरेखादेवी, मुख्य अमात्याचा पुत्र सुकारूमल व मुख्य अमात्य ढेरूमल समोर आले. आणि महाराणी बायजादेवीने घोषणा केली की, तैलादित्य, कचरुमल, अरुणादेवी व दोन राण्या यांनी मिळून कट रचला व गेल्या रात्री त्यांनी महाराणी बायजादेवी व ज्येष्ठ राजकन्या सुरेखादेवी यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण मुख्य अमात्य ढेरूमल व त्याचा शूरवीर पुत्र सुकारूमल यांनी हा कट वेळीच मोडून काढला. सर्व राजद्रोह्यांना अटक करण्यात आली आहे. आता चैत्र पौर्णिमेला राजकन्या सुरेखादेवीचे अमात्यपुत्र सुकारूमलशी विवाह होईल व सुकारूमलला त्याच दिवशी राज्याभिषेकही करण्यात येईल. 

     सा-या रयतेने "राजा सुकारूमल की जय" असा नारा बुलंद केला आणि महाराणी बायजादेवीला राजमातेचा दर्जा प्रदान केला.

(शब्द संख्या :- सुमारे 525)

□□□

@लखनसिंह कमलाबाई कटरे,

    बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,

    ता.आमगांव, जि.गोंदिया.

     (विदर्भ-महाराष्ट्र) चलभाष:-7066968350.

~~~~|||१५.०२.२०१९|||~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन