एक शंका अशीही...!

1)मी एलएल.बी.(1981) करत असताना आम्हाला "नैसर्गिक न्याय तत्व" (Principle of Natural Justice) शिकवताना आमचे प्रोफेसर न्यायालयाच्या विविध निर्णयांचा दाखला देऊन सांगायचे की, हे तत्त्व कोणत्याही कायद्यात "व्याख्यायित" केले नसले तरी हे तत्त्व कोणत्याही न्यायालयीन निर्णयाचा मूलभूत पायाच असते. केलेली कार्यवाही कितीही योग्य(?) असली तरी नैसर्गिक न्याय तत्त्वाचे अनुपालन करणारी नसेल तर ती कार्यवाही या तत्त्वाचे अनुपालन न केल्याच्या तांत्रिक कारणावरून सुद्धा न्यायालय निरस्त/रद्द करू शकतात/करतात. आताही हे "नैसर्गिक न्याय तत्त्व" न्यायालयीन निर्णयात पाळले जात असावे काय?

2)मी महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात तालुका प्रमुख व जिल्हा प्रमुख म्हणून काम करीत असताना (30 वर्षांत) हजारो न्यायिकवत (Quasi Judicial) निर्णय पारित केले होते. आणि त्यातील एकसुद्धा निर्णय कोणत्याही न्यायालयात निरस्त वा रद्द झाल्याचे "मला आढळून आले" नाही. (अपवाद : मंत्री स्तरावरील व विभागाच्या वरीष्ठ अधिका-यांच्या स्तरावरील अपीले मात्र याला अपवाद आहेत.) मी प्रत्येक निर्णय पारित करताना वस्तुस्थिती, कायदा व नियमातील वैधानिक तरतूदींसोबतच "नैसर्गिक न्याय तत्त्वा"चे (संबंधित सर्व पक्षांचे म्हणणे, प्रत्युत्तर, प्रतिप्रत्युत्तर, युक्तिवाद, आदि ऐकून घेण्याचे तत्त्व) सुद्धा strictly अनुपालन करीत असे. माझे असे न्यायिकवत (Quasi Judicial) निर्णय कोणत्याही न्यायालयातून निरस्त/रद्द न होणे, हा सुद्धा "अपवाद"च असावा काय?

3)न्यायालयासमोर आलेले दस्तावेज जर गोपनीय असतील तर ते संबंधित दुस-या पक्षाला न दाखवता, त्यावरील त्या दुस-या पक्षाचे म्हणणे, प्रत्युत्तर, प्रतिप्रत्युत्तर, युक्तिवाद, आदि ऐकून न घेता, परस्पर न्यायालयीन विशेषाधिकाराने निर्णय पारित करणे, आता वैधानिक असते काय? "नैसर्गिक न्याय तत्त्वा"चे अनुपालन आता बंधनकारक/परमावश्यक (Mandatory) उरले नसावे काय?

4)भारतीय संविधानानुसार कोणत्याही नागरिकाचा सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार हाच सर्वोच्च अधिकार असून तो संविधानाच्या मूलभूत पायाचा (Basic Structure चा) एक अनिवार्य तथा परमावश्यक घटक आहे, या अधिकाराला छेद देणारी कोणतीही कृत्यें, कोणतीही कागदपत्रे असूच शकत नाहीत. कोणी तसा युक्तिवाद करू धजल्यास तो त्याचा संविधान-विरोधी पवित्राच समजला पाहिजे. असे मला माझ्या अल्पशा संविधान-अभ्यासाच्या भरोशावर वाटते. माझे हे "वाटणे" चूकीचे व संविधान-विसंगत असावे काय?

5)"तू एवढी मोठी दुधाची गाय मारलीस, आणि मी तर छोटासा वासरूच मारला, म्हणून तूच काय कोणी त्रयस्थ सुद्धा माझ्यावर आरोप करण्याला सक्षम नाही", असा एखाद्याचा युक्तिवाद न्यायालयात टिकेल किंवा कसे, माझ्या या प्रश्नाला/संभ्रमाला उत्तर सापडेल काय?

●अशा काही मुर्खपणाच्या शंका/कुशंका मला बेकारच(!) भंडावून सोडतात. कोणी जाणकार माझी या Dilemma तून सुटका करण्याची माझ्यावर कृपा करील काय?
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार.
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤

अशीच एक शंका...
~~~~~~~~~~
काल का नाही भाऊ, मी आटाचक्कीवर गेलू होतू, आटा पिसावलं. तेथी पायलू तं चक्कीवाल्याना इलेक्ट्रॉनिकका, का मनतत तो वजनकाटा ठेवलं होतंन. माझा नंबर आल्यावर त्याना माझा गव्हाचा थैला काट्यावर ठेवालं सांगलंन. मी सांगलू होतू तोच वजन काट्याना बी सांगलंन. चक्कीवाला खुश झाला. माझा आटा पिसवून झाल्यावर बी मी थोळीसी गंमत पाहावालं भेटते का मून तेथी एका बेंचावर बसून गेलू.
तेवढ्यातच आमचा डोकू महाजन गहू पिसावालं आला. त्याचा नंबर आल्यावर त्याना चक्कीवाल्यालं मनलंन = तुलं आमच्यावर इस्वास नसे का गा, काटा लावलास तं. धर पीस माझे गहू, आहेत दोन किलो.= चक्कीवाल्यालं सक आला, त्याना डोकूचा थैला काट्यावर ठेवलंन तं वजन भरला तीन किलो. चक्कीवाल्याची अना डोकूची थोळीसी चकमक झाली. घळीभ-यातना मंग डोकूना गहू चक्कीमंधी रिचवलंन. आटा जमा झाल्यावर डोकूना आता आटाबी मोजूनच दे मनलंन. चक्कीवाल्याना तनतन करतंच त्याचा आटा मोजून देलंन. भरला बरोबर तीनच किलो.
     आता डोकू महाजन बिछळला, चक्कीवाल्यावर. =मने = गहू पिसल्यावर दोन पायलीचा तीन पायली आटा  होते, अना येथी तं तीन किलोचा तीनच किलो आटा कसा, च्यार किलो भरला पायजे, तू एक किलो आटा चक्कीमंधी चोरलास, माझा आटा वापस कर.= चांगलीच हमरी तुमरीवर आली आता बात.
     मी नाही थांबलू मंग. धीरूना मी तेथना सटकलू अना घरी आलू. आंगपाय धुतलू, बायकोना सयपाक केलंन, जेवलू अना दूपारची झोप घेतलू. उठलू तं डोकू महाजन माझी वाटंच पाहात होता, आमच्या घरी. मनलू कसा गा महाजन, कसा आलास तं? डोकूना सांगलंन, = मंघानी तुमी तं पायल्याच, चक्कीवाल्याना माझा एक किलो आटा मारलंन. मालं त्याची रिपोट करावाची आहे, तंटामुक्ती मंधी, जरा रिपोट लिहून द्या भला.=
     आता मी काय करू? तहीपासून मी हक्काबक्काच आहा. जैरामजीकी.
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902.
~~~~~~~(=========)~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन